१ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |1 February 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१ फेब्रुवारी चालू घडामोडी

जगभरातल्या श्रीमंतांमधला अदाणी-अंबानींचा दबदबा संपला? टॉप १० मधून बाहेर, पाहा नवीन यादी

  • जगभरातल्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भारतातले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी दोघेही हा यादीतून बाहेर पडले आहेत. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकेतली रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदाणी समुहाबद्दल एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल समोर आल्यानंतर अदाणी समुहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली आहे. शेअर्स पडल्यामुळे अदाणी यांची नेटवर्थ एका आठवड्यात खूप कमी झाली आहे. परिणामी जगातल्या १० सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदाणी यांचं नाव बाहेर झालं आहे.
  • हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे एकाच आठवड्यात अदाणींची नेटवर्थ खूप घसरली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणी यांची संपत्ती आता ८४.४ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. या नेटवर्थच्या जोरावर ते जगातले १२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याआधी ते दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

पहिल्या १२ अब्जाधीशांची यादी

१. बर्नार्ड अर्नॉल्ट – १८९ अब्ज डॉलर्स
२. एलोन मस्क – १६० अब्ज डॉलर्स
३. जेफ बेझॉस – १२५ अब्ज डॉलर्स
४. बिल गेट्स – १११ अब्ज डॉलर्स
५.वॉरेन बफेट – १०७ अब्ज डॉलर्स
६. लॅरी एलिसन – ९९.५ अब्ज डॉलर्स
७. लॅरी पेज ९० – अब्ज डॉलर्स
८. स्टीव्ह बाल्मर – ८६.९ अब्ज डॉलर्स
९. सेर्गी ब्रिन – ८६.४ अब्ज डॉलर्स
१०. कार्लोस स्लिम – ८५.७ अब्ज डॉलर्स
११. गौतम अदाणी – ८४.४ अब्ज डॉलर्स
१२. मुकेश अंबानी – ८२.२ अब्ज डॉलर्स

विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश! मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची MPSCला विनंती

  • राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून, मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.”
  • “त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा. आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
  • “महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रात म्हटलं.

अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदे आदिवासींमधूनच भरण्याचा निर्णय

  • राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेली १७ संवर्गातील पदे आदिवासींमधूनच भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या पदांमध्ये तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास  निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, साहाय्यकारी परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, वनरक्षक, कोतवाल, वन-अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी, पोलीस पाटील यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे आदिवासी युवक, युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे राज्य शासनाने म्हटले आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदे आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भरण्याचे ठरविण्यात आले. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय  घेण्यात आला.  
  • ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या २५ ते ५० टक्यांदरम्यान आहे, अशा सर्व गावांमध्ये अधिसूचित संवर्गातील ५० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येतील. त्याचबरोबर ज्या गावांची आदिवासींची लोकसंख्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा गावांमध्ये (कोतवाल व पोलीस पाटील वगळून) २५ टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येणार आहेत. तसेच या गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार तसेच गुणवत्तेनुसार भरली जातील.
  • भरती प्रक्रिया राबविताना स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणारी पदे संबंधित महसुली विभागातील अनुसूचित जमातीच्या स्थानिक भाषा अवगत असलेल्या अर्हताधारक उमेदवारांमधून भरण्यात यावीत. अधिसूचित १७ संवर्गामध्ये  तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास  निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, सहायकारी परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, वनरक्षक, कोतवाल, वन-अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, पोलीस पाटील या पदांचा समावेश आहे.

१० महिन्यांत पंजाब सरकारने दिल्या २६ हजार नोकऱ्या, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दावा

  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या सरकारची स्थापना झाल्यापासून १० महिन्यांत एकूण २६०७४ नौकऱ्या दिल्या आहेत, असा दावा केला आहे. त्यांनी १८८ जणांना कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. या समारंभावेळी ते बोलत होते.

योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे

  • “राज्य एक नवी क्रांती अनुभवत आहे. येथे युकवांना सरकारी नोकरी देऊन सशक्त केले जात आहे. मागील १० महिन्यांपासून योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत २६०७४ जणांना नोकरी देण्यात आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात तरुण-तरुणींना आणखी नोकऱ्या दिल्या जातील,” असे भगवंत मान म्हणाले.
  • “निवडणुकीत अन्य पक्षांनी मतदारांना पक्त आश्वासन दिले होते. आम्ही मतदारांना हमी दिली होती. आम्ही हळूहळू दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू,” असेही भगवंत मान म्हणाले.

५०० आम आदमी क्लिनिकची सुरुवात

  • ‘राज्य सरकारने प्रति महिना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे,’ असेही भगवंत मान यांनी सांगितले. पंजाब सरकारने नुकतेच ५०० आम आदमी क्लिनिक सुरू केले आहेत. याबाबत बोलताना ‘या आम आदमी क्लिनिकमध्ये आम्ही रुग्णांची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने साठवून ठेवतो. यामुळे प्राणघातक आजारांविरोधात लढण्यास मदत होते,’ असेही मान यांनी सांगितले.

माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

  • भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण(वय-९७) यांचे आज(मंगळवार) निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.
  • शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. आजची पिढी भलेही त्यांना आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखत असेल, मात्र त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते राज्यसभा खासदारही होते. सहा वर्षे ते भाजपामध्ये राहिले होते.
  • शांती भूषण आणि त्यांचे पुत्र प्रशांत भूषणही आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली होती. मात्र कालांतराने हे दोघेही आम आदमी पार्टीपासून दूर झाले होते.
  • मोरारजी सरकारमध्ये होते कायदा मंत्री – शांती भूषण हे मोरारजी देसाई सरकारमध्ये १९७७ ते १९७९ पर्यंत कायदा मंत्री होते. त्यांनी आपल्या आयुष्यात लोककल्यणाशी निगडीत अनेक मुद्दे उचलले होते. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा:

  • कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून अंगिकारण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही.
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले आहे.
  • हे राज्यगीत 1.41 मिनिट अवधीचे आहे.

देशात प्रथमच उष्माघात नियंत्रणासाठी कृती आराखडा:

  • उष्माघात नियंत्रणासाठी जास्त उष्ण भागातील रस्ते, इमारतीचे रंग, वृक्ष लागवडीसह इतर व्यवस्थापन कसे असावे याबाबत सध्या केंद्र सरकारकडे कोणताही ठोस आराखडा नाही.
  • मात्र आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेकडे (व्हीएनआयटी) हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.
  • हा आराखडा भविष्यात देशभरात वापरला जाऊ शकतो.
  • उष्माघाताचे रुग्ण व त्यामुळे होणाऱ्या मृत्यू नियंत्रणासाठी केंद्र सरकारने करोनापूर्वी नागपूर, राजकोट आणि झाशी या तीन शहरात उष्माघात व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते.
  • त्यासाठी या शहरातील रस्ते, इमारतीच्या नकाशांसह इतरही अनेक गोष्टींवर तापमान कमी करण्याच्या दृष्टीने लक्ष दिले जाणार होते.
  • त्यासाठी दिल्लीतील ‘एनडीएमए’ संस्थेने नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ संस्थेकडे उष्माघात व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.

आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम:

  • विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल.
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे.
  • मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टनम येथे स्थलांतरित केली जाणार आहे.
  • आंध्र प्रदेश सरकारने 23 एप्रिल 2015 रोजी अमरावती शहर आपली राजधानी म्हणून घोषित केलं होतं.
  • 2020 मध्ये राज्य सरकारने तीन शहरं राजधानी म्हणून बनवण्याची योजना आणली होती.
  • ज्यामध्ये अमरावती, विशाखापट्टनम आणि कुरनूल या शहरांचा समावेश होता.
  • त्यानंतर ही योजना मागे घेण्यात आली आणि अमरावती हेच शहर आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून कायम राहिलं.

दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव आता ‘हिंद सिटी’:

  • दुबईमधील अल मिन्हाद जिल्हा आणि आसपासच्या परिसराचे नाव बदलून आता हिंद सिटी असे नवे नाव देण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी केली.
  • अल मिन्हाद जिल्ह्या चार सेक्टरमध्ये विभागला गेलेला आहे.
  • याला अनुक्रमे हिंद 1, हिंद 2, हिंद 3 आणि हिंद 4 अशी नावे देण्यात आली आहेत.
  • दुबईमध्ये शहराचे किंवा एखाद्या स्थळाचे नाव बदलण्याची ही पहिली वेळ नाही.
  • याआधी देखील 2010 मध्ये दुबईची जगप्रसिद्ध इमारत बुर्ज दुबईचे नाव बदलण्यात आले होते.
  • अबू धाबीचे शासक आणि संयुक्त अरब अमीरातचे माजी राष्ट्रपती शेख खलीफा बिन जायद अल नाहयान यांच्या नावाने बुर्ज दुबईच्या इमारतीला बुर्ज खलीफा असे नाव दिले होते.

भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज दीप्ती शर्माचा ICC T20 क्रमवारीत जलवा:

  • भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे आणि आता इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनच्या अव्वल स्थानावर लक्ष आहे.
  • 25 वर्षीय ऑफस्पिनर दीप्ती, दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत नऊ विकेटसह सर्वात यशस्वी गोलंदाज, आता इंग्लंडच्या डावखुरा फिरकीपटू एक्लेस्टोनपासून केवळ 26 गुणांनी विभक्त झाली आहे.

हरमनप्रीत कौर आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रँडची होणार ब्रँड अ‍ॅम्बेसेडर:

  • भारताची स्टार फलंदाज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने एका आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रँडशी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून हातमिळवणी केली आहे.
  • पंजाबच्या 33 वर्षीय तेजस्वी फलंदाजाने जगातील चौथ्या जलद महिला टी20 शतकाचा विक्रम केला आहे आणि महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ती भारताची एकमेव शतकवीर आहे.
  • 2017 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
  • एक ब्रँड म्हणून, Puma नेहमी आपल्या वेळेच्या पुढे आहे आणि खेळांमध्ये महिलांना पाठिंबा देण्यासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी आणि सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
  • या करारामुळे, हरमनप्रीत प्यूमाच्या विराट कोहली, केएल राहुल, करीना कपूर खान, युवराज सिंग, सुनील छेत्री अलीकडे हार्डी संधू आणि अनुष्का शर्मा यांसारख्या मोठ्या व्यक्तींच्या यादीत सामील झाली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.