३० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |30 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३० सप्टेंबर चालू घडामोडी

सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

  • चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र अंतिम फेरीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतासाठी नेमबाजीतील हे आठवे रौप्य पदक आहे. एकूणच भारतासाठी नेमबाजीतील हे १९ वे पदक ठरले. नेमबाजीत भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.
  • १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत यजमान चीन पहिल्या क्रमांकावर राहिला आणि सुवर्णपदक जिंकले. भारताने १४ तर चीनने १६ गुण मिळवले. सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक ठरले. आतापर्यंत भारताच्या खात्यात ३४ पदके जमा झाली आहेत. भारताच्या खात्यातील हे एकूण १३ वे रौप्य पदक ठरले. याशिवाय भारतीय संघाने ८ सुवर्ण आणि १३ कांस्यपदकेही जिंकली आहेत.

नेमबाजीतील भारताची आतापर्यंतची कामगिरी –

  • भारताला पहिले सुवर्णपदक नेमबाजीत मिळाले होते. आतापर्यंत भारताने नेमबाजीत १९ पदके जिंकली असून त्यात ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय नेमबाज सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

लांब उडीतही भारताकडून पदकाची अपेक्षा –

  • त्याचबरोबर लांब उडीतही भारताकडून पदकाची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू मुरली श्रीशंकरने लांब उडीच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी मुरलीला ७.९० मीटर लांब उडी आवश्यक होती, परंतु त्याने ७.९७ मीटरच्या लांब उडीसह अंतिम फेरीत आपले नाव नोंदवले. हा आकडा त्याने पहिल्याच प्रयत्नात गाठला होता.

नवव्या वर्षी उचलली बंदूक, १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन, Asian Games मध्ये ४ पदकं जिंकून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं

  • टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी जेमतेम होती. त्या अपयशातून सावरलेल्या भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची रांग लावली आहे. प्रामुख्याने भारतीय नेमबाजांनी त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत दररोज किमान पाच ते सहा पदकं पटकावत आहेत. यावर्षीच्या स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या यादीत अनेक नवीन नावं पाहायला मिळत आहेत. यामध्ये एक खेळाडू अशी आहे जी अवघी १८ वर्षांची आहे. परंतु, तिच्याकडे पाहिलं तर ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हा वाक्प्रचार आठवतो. कारण ईशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने एकटीने चार पदकांवर आपलं नाव कोरलं आहे.
  • ईशाने १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक, १० मीटर एअर पिस्तूल महिला वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. तत्पूर्वी तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह तिने एकटीने चार पदकं पटकावली आहेत.
  • वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिल्यांदा रायफल उचणाऱ्या ईशाचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. ईशा ही नवव्या वर्षी तिचे वडील सचिन यांच्याबरोबर पहिल्यांदा शूटिंग (नेमबाजी) रेंजवर गेली होती. तिथेच तिने पहिल्यांदा बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला होता. त्यानंतर तिलाही बंदुकीने नेमबाजी कराविशी वाटली. त्यामुळे ती रायफल उचलायला गेली आणि जमिनीवर पडली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला शॉटगन भेट दिली.

वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन बनली

  • ईशाचा नेमबाजीतला रस पाहून तिच्या पालकांनी तिला त्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू ईशा नेमबाजी शिकू लागली. तसेच ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेमबाजी करू लागली. त्यानंतर ती राज्य स्तरावरील स्पर्धा जिंकू लागली. ईशा ही २०१८ साली झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या वेळी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. त्यावेळी तिने हीना सिद्धू आणि मनू भाकर या दोन नावाजलेल्या नेमबाजांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावलं होतं. तेव्हा ईशा केवळ १३ वर्षांची होती. तसेच त्या स्पर्धेतील सर्वात लहान सुवर्णपदक विजेती खेळाडू ठरली होती.

नऊ महिन्यांतच कर्जभार ६७ हजार कोटींवर; गतवर्षांच्या तुलनेत राज्याची जास्त कर्जउभारणी

  • चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) रोखे बाजारातून २२ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांतील कर्जाची रक्कम ६७ हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत राज्यावरील कर्जभार यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  • चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत राज्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाची आकडेवारी रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केली आहे. या तिमाहीत विविध राज्यांकडून एकूण २ लाख ३७ हजार कोटींचे कर्ज रोखे बाजारातून उभे करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक कर्ज उत्तर प्रदेश (३१ हजार ५०० कोटी) घेणार असून त्याखालोखाल कर्नाटकचा (३० हजार कोटी) क्रमांक आहे. महाराष्ट्र सरकारने २२ हजार कोटी कर्ज घेण्याची मागणी रिझव्‍‌र्ह बँकेकडे नोंदविली होती. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी हे कर्ज वापरण्यात येते. अर्थसंकल्प तयार करतानाच या कर्जाचा विचार करूनच नियोजन केले जाते.
  • राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये मिळून एकूण ४५ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यात तिसऱ्या तिमाहीतील २२ हजार कोटींची भर पडून कर्जभार ६७ हजार कोटींवर पोहोचला आहे. गत आर्थिक वर्षांत राज्य सरकारने एकूण ७२ हजार कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्या तुलनेत यंदा तिसऱ्या तिमाहीतच ९० टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज राज्य सरकार उभारणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीस एकूण कर्जात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
  • चालू आर्थिक वर्षांअखेर राज्यावरील कर्जाचा बोजा सात लाख कोटींच्या वर जाण्याचा अंदाज आहे. कर्जाचा बोजा वाढला असला तरी स्थूल राज्य उत्पन्नाच्या हे प्रमाण १८.२३ टक्के आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने २५ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत कर्ज घेण्यास मुभा दिल्याने राज्याचे कर्जाचे प्रमाण आटोक्यात असल्याचे उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकने गेल्या आर्थिक वर्षांत ३६ हजार कोटींचे कर्ज उभे केले होते. यंदा तिसऱ्या तिमहीअखेर ४९ हजार कोटींचे कर्ज होणार आहे. राजस्थानमधील कर्जाचे प्रमाण वाढले आहे.

दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी विशेष रेल्वे गाडय़ांच्या कालावधीत वाढ

  • मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विशेष  गाडय़ांच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे २५ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी १६ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७६३७ तिरुपती- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी आता १५ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात येईल. 
  • गाडी क्रमांक ०७१९६ दादर – काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे २८ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.  गाडी क्रमांक ०७१९५ काझीपेठ- दादर साप्ताहिक विशेष २७ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. ही रेल्वेगाडी ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येईल. गाडी क्रमांक ०७१९८ दादर- काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे १ ऑक्टोबरपर्यंत चालवण्यात येईल. तसेच ही रेल्वेगाडी ८ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७१९७ काझीपेठ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे ३० सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येईल.

भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल; सामान्य विद्यार्थ्यांच्या लुटीचा आरोप

  • राज्यात टीसीएस आणि आयबीपीएस या दोन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सरळसेवा भरती सुरू आहे. यासाठी आकारण्यात येणाऱ्या अवाजवी शुल्काला सर्वच स्तरांतून विरोध होत असतानाही आतापर्यंत शासनाने घेतलेल्या तीन विभागांच्या भरतीमधून सुमारे २६५ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. यामुळे सामान्य विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचा आरोप होत आहे.    
  •  राज्य सरकारने ७५ हजार पदांच्या महाभरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार वन विभाग, तलाठी (महसूल), जिल्हा परिषद व आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विभागात रिक्त जागांच्या तुलनेत अर्जाची संख्या किमान पाच ते सहापट आहे. प्रत्येक भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला एक हजार तर मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपयांचे शुल्क भरावे लागते. त्यानुसार,  तीन विभागांच्या भरतीतून सरकारच्या तिजोरीत अंदाजे २६५ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. दरम्यान, उर्वरित शासकीय विभागांमध्ये ४० ते ६० हजार पदांची आणखी भरती होणार आहे.
  • राज्य सरकारकडे वारंवार विनंतीअर्ज करूनही सरळसेवा भरतीसाठीचे शुल्क कमी केले जात नाही. खासगी कंपन्यांचे भले करण्याचा हा प्रकार आहे. कंत्राटी भरतीचा निर्णयही विद्यार्थीविरोधी आहे.

एम एस स्वामिनाथन यांना आज अखेरचा निरोप

  • भारतातील ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. स्वामिनाथन यांचे गुरुवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुली आहेत. त्यांची कन्या डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
  • स्वामिनाथन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नई येथील एम एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) या संस्थेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व थरांतील लोकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर आज, ३० सप्टेंबरला संपूर्ण पोलीस इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
  • भारतात १९६० च्या दशकात भुकेची समस्या आ वासून उभी असताना आधुनिक पद्धतीच्या शेतीचा प्रसार करून स्वामिनाथन यांनी देशात हरित क्रांती घडवून आणली. त्यानंतर एकेकाळी अन्नधान्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून राहणारा देश ही अशी ओळख पुसून ‘जगाचे धान्याचे कोठार’ अशी नवी ओळख भारताने मिळवली. स्वामिनाथन यांच्या निधनामुळे कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार यांचे युग संपुष्टात आले असल्याची प्रतिक्रिया भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक ए के सिंह यांनी व्यक्त केली.
  • देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात स्वामिनाथन यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशासनात असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. त्यांनी २००४ साली राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

३० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.