४ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
४ जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |4 July 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

४ जुलै चालू घडामोडी

पंतप्रधानांच्या बंगल्यावरून ड्रोनच्या घिरट्या, दिल्लीत खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दिल्लीतलं निवासस्थान असलेल्या परिसरात सोमवारी सकाळी मोठी खळबळ माजली होती. कारण पंतप्रधानांच्या बंगल्यावरून ड्रोन उडत असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास आलं होतं. एसपीजीने (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) या ड्रोनची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर दिल्ली पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी पंतप्रधानांच्या निवास्थानी दाखल झाले. सकाळी साधारण ५ वाजता एसपीजीने नवी दिल्ली पोलिसांना यासबंधीची माहिती दिली होती. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु अद्याप कोणतंही ड्रोन पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
  • हे ड्रोन नेमकं कोणाचं होतं याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच ते ड्रोन पंतप्रधानांच्या निवास्थानापर्यंत कसं पोहचलं हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. मुळात पंतप्रधानांचं निवास्थान असलेला परिसर नो फ्लाईंग झोनमध्ये येतो. तरीदेखील या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत.
  • दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, एनडीडी नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली होती की, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एक उडणारी वस्तू दिसली आहे. त्यानंतर आसपासच्या परिसरात शोध घेण्यात आला, परंतु अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यानंतर आम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी (एटीसी) संपर्क साधला. त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू सापडली नाही.
  • पंतप्रधानांचं निवासस्थान ७, लोक कल्याण मार्गावर आहे. या रस्त्याचं आधीचं नाव ७, रेस कोर्स रोड असं होतं. तर पंतप्रधानांच्या बंगल्याचं अधिकृत नाव पंचवटी असं आहे. पंतप्रधानांच्या निवसस्थानाबाहेर कडेकोड सुरक्षा व्यवस्था असते. ही सुरक्षा व्यवस्था इतकी चोख असते की, अगदी पंतप्रधानांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी पंतप्रधानांना भेटायला जात असेल तरी त्या व्यक्तिला अनेक सुरक्षा टप्पे पार करून जावं लागतं. तसेच दररोज पंतप्रधानांना भेटणाऱ्या लोकांची एक यादी त्यांचे सचिव तयार करतात. या यादीत ज्या व्यक्तीचं नाव असेल केवळ तीच व्यक्ती पंतप्रधानांना भेटू शकते. तसेच पंतप्रधानांना भेटायला जाणाऱ्या व्यक्तिंकडे ओळखपत्र असणं आवश्यक असतं. जे अनेक सुरक्षा टप्प्यांदरम्यान दिलं जातं.

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र बुधवारी उपलब्ध

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र बुधवारी (५ जुलै) सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
  • जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रांची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येऊ नये. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असल्यास संबंधित दुरुस्त्या विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाला सादर करावी.
  • प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील वाढत्या बस अपघातांमागे ‘असे’ही कारण…

  • समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मालिकेने रस्ता सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी प्रवासी बसला आग लागून अपघात घडण्याच्या घटना वाढत आहेत. या बसमध्ये करण्यात आलेले काही तांत्रिक बदल यासाठी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. याचबरोबर बसच्या समोरील बाजूस जास्त क्षमतेचे दिवे लावल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
  • समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात सुरू आहेत. या अपघातांच्या मालिकेमुळे परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. अनेक खासगी बसमध्ये प्रकाशयंत्रणेत बदल केले जातात. याकडे आरटीओकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशा बदलांमुळे बसला आग लागण्याच्या घटना घडूनही परिवहन विभागाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाब उघड झाली आहे.
  • समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे खासगी बसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनांना जास्तीत जास्त सात वॉटचे दिवे लावता येतात. खासगी बसला जास्त क्षमतेचे २० ते २५ वॉटचे हॅलोजन दिवे लावले जातात. जास्त क्षमतेचे दिवे लावण्यासाठी आणखी वायरिंग केले जाते. ते निकृष्ट असल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
  • याबाबत पुण्यातील ‘थ्री ए रोड’ फाउंडेशनचे संचालक विजयकुमार दुग्गल यांनी २८ मार्चला परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांना पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी खासगी प्रवासी बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि त्याची कारणे मांडली होती. त्यामुळे खासगी बसमध्ये करण्यात येत असलेल्या अतिरिक्त प्रकाश योजनेचा मुद्दाही उपस्थित केला होता.

वर्ल्डकप वेळापत्रकात झाला बदल, आता ‘या’ दिवशी होणार भारत वि. श्रीलंका मुकाबला; जाणून घ्या

  • रविवारी विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. यासह दासुन शनाकाचा संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात २ नोव्हेंबरला सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचे संघ आमनेसामने असतील. याआधी २०११च्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंकेचे संघ वानखेडे स्टेडियमवर भिडले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत २८ वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.

टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे

  • मात्र, भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. रोहित शर्मा आणि कंपनी १५ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात रोहित शर्माचा संघ बांगलादेशशी भिडणार आहे. मोहिमेतील सर्वात मोठा आणि सर्वात मनोरंजक सामना असणार आहे.
  • बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये सुरू असलेल्या सर्व नाट्यादरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआय या दोघांनीही अहमदाबादमध्ये न खेळण्याची पीसीबीची योजना नाकारली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय श्रीलंका विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, त्यामुळे त्याला भारताच्या गटात स्थान दिले जाईल आणि २ नोव्हेंबरला भारताशी सामना होईल.
  • ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान व्यतिरिक्त भारत आणखी तीन मोठ्या संघांशी भिडणार आहे. भारतीय क्रिकेट संघ २२ ऑक्टोबरला धर्मशाला येथे न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ लखनऊच्या एकाना स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. भारताचा सामना ५ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.