konkan Agri university
konkan Agri university

स्थापना :

कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 18 मे 1972 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. दोन वर्षांनी कोकणातील तीन शेती शाळाही या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली देण्यात आल्या. गेल्या 42 वर्षात विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा लक्षणीय विस्तार झाला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त केलेले अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने अगदी स्थापनेपासून कोकणातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन केले आणि हे उपयुक्त संशोधन कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबविले. त्याचाच परिणाम म्हणून कोकणातील शेतीत क्रांतीकारी परिवर्तन होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे नोकरीसाठी धावणारा तरुणवर्ग आता कोकणात स्थिरावत असून शेती व्यवसायाकडे वळू लागला आहे. इतकेच नाही, तर कोकणातील अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

विस्तार :

विद्यापीठाचे मुख्य केन्द्र दापोली येथे असून, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि बृहन्मुंबई हे जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दिनांक 12 फेब्रुवारी 2001 रोजी कोकणचे सुपुत्र आणि द्रष्टे लोकनेते कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नाव या विद्यापीठाला दिले गेले. राज्यात पशुवैद्यक विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय त्या विद्यापीठाकडे गेले. आजमितीस या विद्यापीठामध्ये कृषी, मत्स्य आणि कृषी अभियांत्रिकी अशा तीन विद्याशाखा आहेत.

अभ्यासक्रम :

दापोली (रत्नागिरी) येथे कृषी, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र आणि उद्यानविद्या तसेच रोहा (रायगड) येथे काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रम व मुळदे (सिंधुदूर्ग) येथे उद्यान महाविद्यालय अशी सहा घटक महाविद्यालये असून रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे. याशिवाय विद्यापीठाची मान्यताप्राप्त सहा कृषी व एक उद्यानविद्या महाविद्यालय, दोन कृषी पणन व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये, चार अन्नतंत्र महाविद्यालये, चार जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि एक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कार्यरत आहे. अशाप्रकारे आठ विषयांतील पदवी शिक्षणाची सोय विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. याशिवाय, कृषी विद्याशाखेमध्ये अकरा विषयांत, मत्स्य विद्याशाखेत सहा विषयांत आणि कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत पाच विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्याशाखेत नऊ आणि मत्स्य विद्याशाखेत सहा विषयात पीएच्.डी. शिक्षण दिले जाते. कृषी अभियांत्रिकीच्या तीन विषयात पीएच्.डी. शिक्षणाची सुविधा सुरु आहे.

विद्यापीठाच्या निम्नस्तर कृषी विद्याशाखेंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे विद्यापीठाची घटक कृषी तंत्र विद्यालये आहेत. शिवाय पालघर जिल्ह्यातील कोसबाडहिल येथील दोन कृषी तंत्र विद्यालये तसेच 34 खाजगी मान्यताप्राप्त कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. घटक तंत्र विद्यालयामध्ये दोन वर्ष कालावधीचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम तर विना अनुदानित तंत्र विद्यालयामध्ये 3 वर्ष कालावधीचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच शिरगांव (रत्नागिरी) येथे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहे याशिवाय बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकविला जातो.

दिग्गज विद्यार्थ्यांची परंपरा :

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय यश संपादन केले आहे. कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयाचा अमोल थोरात सन 2007 मध्ये देशात पहिला आला. कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती 2008 परीक्षेत याच महाविद्यालयाचा मकरंद गुजर याने वनशास्त्र विषयात, तर रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी मोहम्मद राथर व गजानन बिरहारे (अनुसूचित जमाती प्रवर्ग) यांनी मत्स्यशास्त्र विषयात संपूर्ण देशात पहिला येण्याचा मान मिळविला. याच महाविद्यालयाचा त्रिवेश मयेकर याने देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. दापोली कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची कीर्ती जालगांवकर ही विद्यार्थीनी अनुसूचित जाती प्रवर्गात देशात पहिली, तर अनुसूचित जमाती प्रवर्गात राजेन्द्र गवारी हा देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या स्पर्धा परीक्षेत विद्यापीठाचे एकूण 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 23 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचा मान मिळवून या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची ही उज्ज्वल परंपरा कायम राखली.

सुविधा :

दापोली येथे विद्यापीठाचे मध्यवर्ती ग्रंथालय असून तेथे 49 हजारहून अधिक ग्रंथ व क्रमिक पुस्तके आहेत. त्याशिवाय, कोकणाविषयी आणि स्पर्धा परीक्षांविषयी स्वतंत्र दालने आहेत. ग्रंथालयात शंभराहून अधिक नियतकालिके व वर्तमानपत्रे येतात. याशिवाय, प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र ग्रंथालय आहे. विद्यापीठातील सर्वच महाविद्यालये, ग्रंथालये, वसतीगृहे इत्यादी ठिकाणी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातर्फे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध शिष्यवृत्त्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया तसेच रोजगारासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

संशोधन :

वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि कोकणात सर्वदूर पसरलेल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन कार्य चालते. कृषी विद्याशाखेतील संशोधन प्रामुख्याने तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, फळपिके, कृषी वनिकी, चारापिके, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वनस्पती जैवतंत्रज्ञान, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, रेशीम शेती, उच्चतंत्र शेती, खार जमीन, कृषी अभियांत्रिकी आणि सामाजिक-आर्थिक विषयांवर केंद्रात असते. मत्स्य विद्याशाखेत सागरी, निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन या विषयांवर संशोधन केले जाते व त्यामध्ये मत्स्य उत्पादन व प्रक्रिया, मत्स्य संसाधन व्यवस्थापन आणि मत्स्य जीवशास्त्र इत्यादी विषयांवर भर दिला जातो. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेमध्ये मृद व जलसंधारण, सिंचन व निचरा, कृषी संरचना, कृषी प्रक्रिया, कृषी शक्ती आणि यंत्रे, विद्युत व इतर ऊर्जा साधने इत्यादींशी संबंधित अभियांत्रिकी बाबींवर संशोधन केले जाते. विविध संस्थांनी पुरस्कृत केलेले सुमारे 130 संशोधन प्रकल्प सध्या विद्यापीठात कार्यान्वित आहेत.

अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा शोध :

विद्यापीठाने आतापर्यंत कोकणातील महत्त्वाच्या पिकांच्या 75 पेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. त्यामध्ये भाताच्या तीस सुधारित व पाच संकरित, नागलीच्या दोन, चवळी, वाल व भुईमुगाच्या प्रत्येकी दोन, कुळीथ, चारा चवळी, राईसबिन, तूर, टोमॅटो, मिरची, काकडी, कारली, पडवळ, शिराळी, वाली, घेवडा, शेवगा, माठ, अळू, कोंथिबीर या पिकांची प्रत्येकी एक आणि कणगर, घोरकंद करंदा व रताळी या कांदापिकांच्या प्रत्येकी एक जातींचा समावेश आहे. फळपिकांमध्ये विद्यापीठाने आंब्याच्या सात, काजूच्या आठ, कोकम आणि नारळाच्या प्रत्येकी दोन, जायफळाच्या तीन आणि दालचिनी, करवंद, फणस, जांभूळ, लिंबू आणि सुपारीची प्रत्येकी एक जात प्रसारित केली आहे. या सर्वच पिकांच्या लागवड पद्धती देखील विद्यापीठाने प्रमाणित केल्या आहेत.

हापूस आंब्यातील अनियमित फलधारणा आणि फळातील साका हे दोष घालविण्यासाठी रत्ना आणि सिंधु या दोन संकरित जाती विद्यापीठाने विकसित केल्या. आंबा निर्यातीच्या दृष्टीने हापूस आंब्यातील साका ही विकृती गंभीर समस्या होती म्हणून विद्यापीठाने सेंट्रल इलेक्ट्रानिक इंजीनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्च, बंगलोर येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हापूस आंबा फळे न कापता त्याचे यंत्राद्वारे स्कॅनिंग करुन आंबा फळातील साका ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तसेच पॅक्लोब्युट्रॉझॉल या वाढनिरोधकाचा वापर आणि साक्यावर नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय योजनांची शिफारस केली. आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना व वेळापत्रक तयार करण्यात आले. दर्जेदार कलमांच्या सातत्याने वाढत असलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कोय कलम व मृदूकाष्ठ कलम पद्धती प्रमाणित केल्या. फळांवर प्रक्रिया करुन विविध टिकाऊ पदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञान देखील विद्यापिठाने विकसित केले आहे. कोकणात उत्पादित होणारी काजू बोंडे, करवंदे व जांभूळ मोठ्या प्रमाणावर वाया जातात तसेच जांभूळाचेही उत्पादन कोकणात मोठ्या प्रमाणात होते. या फळांपासून वाईन निर्मिती संबंधी संशोधन हाती घेण्यात आले असून वाईन निर्मिती करण्यात विद्यापीठास यशही आले आहे. याबाबत पुढील संशोधन चालू आहे. नारळ-सुपारींच्या बागांमधून आणि उत्पन्न मिळविण्यासाठी आंतरपिक म्हणून बहुवर्षीय मसाला पिकांची लागवड करावी, अशीही शिफारस विद्यापीठाने केली आहे. उच्चतंत्र पुष्पशेतीचा विद्यापीठात सुरु असलेला प्रकल्प आदर्शवत आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, अळंबी संवर्धन, रेशीमशेती, मधुमक्षिका पालन, गांडूळखत निर्मिती इत्यादी पूरक व्यवसायांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने प्रमाणित केले आहे.

कोकणातील डोंगराळ भागात छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विखुरलेली शेती व अति पर्जन्यमान यामुळे शेतीच्या अभियांत्रिकीकरणावर मर्यादा पडतात, म्हणून विद्यापीठाने सुरुवातीपासून छोटी-छोटी, कमी खर्चिक व वापरण्यास सुलभ कृषी अवजारे आणि यंत्रे विकसित करण्यावर भर दिला, त्यामध्ये सुधारित वैभव विळा, अतुल चिकू झोला, नूतन आंबा झेला, अंकूर दातेरी फावडे, स्वस्तिक भुईमूग भरणी अवजार, पंकज चिखलणी अवजार इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. जलसंधारणासाठी कोकण जलकुंड आणि विजय बंधारा असे कमी खर्चीक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केले आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, मृद संधारण, सूक्ष्म सिंचन इत्यादी बाबतीतही विद्यापीठाने उपयुक्त शिफारसी केल्या आहेत. फळमाशीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रक्षक सापळ्यास खूप मागणी आहे.

मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या दूर करुन मत्स्योत्पादन वाढीस पोषक असे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मत्स्य विद्याशाखेने विकसित केले आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या जलजीवांच्या महत्त्वपूर्ण जातींची निवड, गोड्या पाण्यातील तसेस सागरी कोळंबीचे बीजोत्पादन, काकईचे तराफ्यावरील संवर्धन, कोळंबी संवर्धनासाठी लागणाऱ्या कृत्रिम खाद्याची निर्मिती, समुद्रातील मोठ्या शेवाळांपासून आगर व अल्जिनिक आम्ल तयार करण्याचे तंत्रज्ञान, बाजारात कमी किंमत असलेल्या माशापासून बॉल्स, वेफर्स, फिंगर्स, पावडर इत्यादी विक्रीयोग्य खाद्य पदार्थांची निर्मिती, शोभिवंत माशांचे बिजोत्पादन व त्यांच्यासाठी कृत्रिम खाद्याची निर्मिती, केंन्ड माशांच्या उपद्रवी जातींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना, खेकड्यांचे पुष्टीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींवरील संशोधनाचा समावेश आहे.

विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा संबंधितांपर्यंत प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनेक नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये आंबा व काजू मोहोर संरक्षण मोहीम, फिरती कृषी प्रदर्शनी, कृषी विकास युवक मंडळांची स्थापना मुंबईस्थित कोकणवासीय ग्रामविकास मंडळांचे मेळावे, महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषी पर्यटन, लोकसहभागातून वृक्षारोपण व जलसंधारण मोहीम, फिरते कृषी चिकित्सालय इत्यादींचा समावेश आहे. विद्यापीठाचे दापोली येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, गणपतीपुळे येथील कृषी तंत्रज्ञान माहिती उपकेंद्र आणि चारही जिल्ह्यातील घटक महाविद्यालये व संशोधन केंद्रावर कार्यरत असलेले विस्तार विशेषज्ञ यांच्या मार्फत कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य करण्यात येते. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि मच्छिमार-शास्त्रज्ञ मंच स्थापन करुन या कार्याला गती देण्यात आली आहे. कृषी दैनंदिनी, विविध विषयावरील पुस्तिका, घडीपत्रिका, भित्तीपत्रके इत्यादी प्रकाशने, वृत्तपत्रे व नियतकालिकांमधील लेख, आकाशवाणी व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम, शेतकरी मेळावे व कृषी प्रदर्शनाचे नियोजनबद्ध आयोजन करुनही तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य केले जाते. याशिवाय, शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण युवक-युवती, ग्रामीण कारागीर, मच्छिमार बांधव, विस्तार कार्यकर्ते इत्यादींसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण आयोजित केले जाते. शासनाचा कृषी व इतर विकास विभाग, खाजगी व स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधून विद्यापीठाचे विस्तार शिक्षण कार्य केले जाते.

विविध पुरस्कार :

विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात केलेल्या मौलिक योगदानाची दखल घेत, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने देशातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ म्हणून 1997 साली या विद्यापीठाला गौरविले आहे. तत्पूर्वी 1979-80 साली म्हशीचे स्वादूपिंड आणि फुफ्फुसापासून अनुक्रमे इन्सुलिन आणि हेपॅरिन निर्मिती तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कार, 1981 साली आंब्याच्या कोय कलम तंत्रज्ञान प्रमाणीकरणासाठी डॉ.जे.एस. पटेल पुरस्कार, 1984 साली वैभव विळ्यासाठी पारखे पुरस्कार, 1988 साली उद्यानविद्या विषयक उल्लेखनीय संशोधन व विकास कार्याबद्दल कृषीभूषण पुरस्कार, 1993 साली नूतन आंबा झेल्यासाठी हरी मालिनी जोशी पुरस्कार व आंब्याच्या सिंधू जातीसाठी फाय फाऊंडेशन पुरस्कार, 1994 साली वनीकरण व पर्यावरण संवर्धन कार्यासाठी राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार आणि राष्ट्रीय स्तरावरील इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार व 1996 साली संकरीत भातावरील उत्कृष्ट संशोधन व विस्तार कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी विद्यापीठाला गौरविण्यात आले. तसेच निळेली येथील संशोधन केंद्राला राज्य शासनाने 2007-08 चा वनश्री पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आहे. याशिवाय सन 2011 साली पर्यावरण संतुलन, वनविकास या कार्यासाठी राज्य शासनाचा वनश्री 2011 चा पुरस्कार वनशास्त्र महावि़द्यालय, दापोली यांना देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच चालू वर्षी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मुळदे येथील ताड प्रकल्पास सर्वोत्कृष्ट अखिल भारतीय समन्वित ताड प्रकल्प म्हणून सन्मानीत केले आहे.

संपर्क :

या विद्यापीठाशी त्यांच्या www.dbskkv.org या संकेतस्थळाद्वारे संपर्क केल्या जाऊ शकते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *