Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 July 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१३ जुलै चालू घडामोडी
साताऱ्याच्या एकलव्यचा खडतर सुवर्णप्रवास! ; युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत इतिहास घडवणाऱ्या पार्थच्या यशामागची कहाणी
- एकलव्यने द्रोणाचार्याना गुरू मानून धनुर्विद्या आत्मसात केली. महाभारतातील अर्जुनाला प्रत्यक्ष द्रोणाचार्याचे मार्गदर्शन मिळाले. मात्र, या आधुनिक युगातील पार्थला द्रोणाचार्य मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. या पार्थने ‘युटय़ूब’मार्फत धनुर्विद्येचे धडे गिरवले आणि स्वत:मधील तिरंदाज जागा ठेवला. नेमके मार्गदर्शन मिळाल्यावर या पार्थने म्हणजेच साताऱ्याच्या पार्थ साळुंखेने जागतिक नकाशावर आपले नाव कोरले. ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या रीकव्र्ह प्रकारात पार्थने युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला.
- आयर्लंड येथील युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णयश मिळवलेल्या पार्थचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘‘ऑलिम्पिकच्या लढती टीव्हीवर पाहून तिरंदाजीची मला आवड निर्माण झाली. शाळेमध्ये हा खेळ सुरू झाला. हा खेळ शिकण्यासाठी धनुष्यबाणही खरेदी केला होता. मात्र, तिरंदाजी प्रशिक्षकांपर्यंत पोचण्यापूर्वीच ते शाळा सोडून गेले. मग शालेय शिक्षक असलेल्या वडिलांनी धीर दिला आणि त्यांच्यासह ‘युटय़ूब’वरून या खेळातील बारकावे शिकू लागलो,’’ असे पार्थने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
- कधी घरात, कधी शाळेने उपलब्ध करून दिलेल्या मैदानात, तर कधी शेतात पार्थचे तीर लक्ष्य साधू लागले होते. पार्थच्या या अशा प्रशिक्षणाचा कालावधी थोडाथोडका नव्हता. पार्थने २०१३ ते २०१८ अशी तब्बल पाच वर्षे अशाच पद्धतीने प्रशिक्षण घेतले. याच कालावधीत २०१६ मध्ये पार्थने इंदूरला शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर २०१८मध्ये पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत पार्थला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, स्पर्धेतील पहिल्या दहा तिरंदाजांची क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि तेथे पार्थमधील एकलव्याला खऱ्या अर्थाने द्रोणाचार्य मिळाले व त्याच्यातील अंगभूत गुणवत्तेला पैलू पडले. केंद्रातील प्रशिक्षक राम अवधेश यांनी पार्थला घडवले.
- जागतिक यशाबद्दल पार्थ म्हणाला, ‘‘तुटपुंज्या प्रशिक्षणावर मी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यामुळे मोठय़ा स्पर्धेत उतरल्यावर काय करायचे किंवा कसे खेळायचे याचे दडपण मला कधीच नव्हते. यापूर्वी २०२१च्या जागतिक युवा स्पर्धेतच मी पदार्पणात सांघिक सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो होतो. या यशाने स्फूर्ती मिळाली आणि आता वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. कोरियन स्पर्धकांसमोर आपले तिरंदाज अपयशी ठरतात. मात्र, या वेळी माझ्या पदकाने हे चित्र बदलले याचा आनंद अधिक आहे.’’
गुरुवारी मंत्रीमंडळ विस्तार होणार? अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चेला उधाण
- महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मागील जवळपास दीड वर्षांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सातत्याने नवनवीन तारखा दिल्यानंतर अलीकडेच अचानक अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार गट सत्तेत सामील होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मागून आलेल्या आमदारांचा आधी शपथविधी घेतल्याने शिंदे गटासह भाजपातील अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराचा गुंता आणखी वाढत चालला आहे.
- याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर उद्या (गुरुवार, १३ जुलै) उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी कार्यक्रम होईल, असं बोललं जात आहे.
- तत्पूर्वी, सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदाराची बैठक पार पडणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळणार? याबाबतच चित्र स्पष्ट होणार आहे. खरं तर, शिंदे गटासह भाजपाचे अनेक आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार; विश्वस्त सुशीलकुमारांचे मौन
- लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून गांधी-नेहरूंचा वैचारिक वारसा संपविण्यासाठी आणि देशात हुकूमशाही लादण्यात कार्यमग्न असल्याचा ज्यांच्यावर आक्षेप घेतला जातो, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून वादंग माजले असतानाच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले आहे.
- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक पुण्यतिथीनिमित्त १ आॕगस्ट रोजी हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख सत्ताधारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
- काँग्रेसी विचार परंपरा जपणा-या टिळक स्मारक ट्रस्टने पंतप्रधान मोदी यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या काही पदाधिका-यांसह सेवादल, इंटक तसेच आम आदमी पार्टी (आप) तसेच युवक क्रांती दलाने (युक्रांद) आदी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मोदी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.
- या पार्श्वभूमीवर टिळक स्मारक ट्रस्ट मंडळाचे विश्वस्त असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत मौन बाळगले. विश्वस्त मंडळाने पुरस्काराचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्यावर आपण बोलणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना ७,५३२ कोटी रुपये निधी जारी
- अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज २२ राज्य सरकारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) साठी ७,५३२ कोटी रुपये जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार ही रक्कम जारी करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्राला १४२० कोटी ८० लाख रुपये जारी करण्यात आले आहेत. देशभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्यात आली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना जारी केलेल्या रकमेच्या वापराच्या प्रमाणपत्राची वाट न पाहता राज्यांना तात्काळ मदत म्हणून ही रक्कम जारी करण्यात आली आहे.
- आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ४८ (१) (अ) अंतर्गत प्रत्येक राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची (एसडीआरएफ) स्थापना करण्यात आली आहे. हा निधी अधिसूचित आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारांकडे उपलब्ध असलेला हा प्राथमिक निधी आहे. केंद्र सरकार सर्वसाधारण राज्यांमध्ये एसडीआरएफ मध्ये ७५% तर ईशान्य प्रदेश आणि हिमालयातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यांमध्ये ९०% योगदान देते.
- वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वार्षिक केंद्रीय योगदान दोन समान हप्त्यांमध्ये जारी केले जाते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार,आधीच्या हप्त्यात जारी केलेल्या रकमेच्या वापराचे प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि एसडीआरएफकडून हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत राज्य सरकारकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधी जारी केला जातो. मात्र, तातडीची गरज लक्षात घेऊन यावेळी निधी जारी करताना अटी शिथिल करण्यात आल्यात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, कीटकांचा हल्ला आणि हिमवृष्टी आणि शीतलहरी यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना त्वरित मदत पुरवण्यासाठी खर्च केला जातो.
- याआधी केलेला खर्च, क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि आपत्ती जोखीम निर्देशांक यांसारख्या अनेक घटकांच्या आधारे राज्यांना एसडीआरएफ निधीचे वाटप केले जाते. हे घटक राज्यांची संस्थात्मक क्षमता, जोखीम आणि धोक्याची शक्यता दर्शवतात. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकारने २०२१-२२ ते २०२५-२६ या वर्षांसाठी एसडीआरएफसाठी १,२८,१२२.४० कोटी रुपये तरतूद केली आहे. या रकमेपैकी केंद्र सरकारचा हिस्सा ९८,०८०.८० कोटी रुपये आहे. केंद्र सरकारने याआधी ३४,१४०.०० कोटी रुपये जारी केले होते. त्यामुळे आतापर्यंत राज्य सरकारांना जारी केलेल्या एसडीआरएफमधील केंद्राच्या हिश्श्याची एकूण रक्कम ४२,३६६ कोटींवर गेली आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १२ जुलै २०२३ चालू घडामोडी
- ११ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १० जुलै २०२३ चालू घडामोडी
- ९ जुलै २०२३ चालू घडामोडी
- ८ जुलै २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |