आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

जन्म: यमुना, ३१ मार्च, इ.स. १८६५, पुणे ,

मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७ (वय वर्ष २१)

जीवन
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीची शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादीच्या शतपत्रांतून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.

वैद्यकीय शिक्षण
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी “विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया” मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर या जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.

सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला. आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे .

आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली.
स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोर्‍या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात.

भारतात आगमन
एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पिटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

मृत्यू
वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असं समजणार्‍या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी तिला मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कार्पेटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) तिचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.

डॉक्युड्रामा
आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तने यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला आहे. या लघुपटात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोश्यांची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली आहे. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *