जन्म | जून २७, इ.स. १८६४ महाड, महाराष्ट्र |
---|---|
मृत्यू | सप्टेंबर २७, इ.स. १९२९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | पत्रकारिता, साहित्य |
प्रसिद्ध कामे | काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास |
शिवराम महादेव परांजपे हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते.
तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ‘काळ‘ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.
शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रात महाड येथे झाला. त्यां
चे शिक्षण महाड, रत्नागिरी व पुणे या ठिकाणी झाले.
मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना संस्कृत भाषेसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली.
या शिष्यवृत्तीचे ते पहिले मानकरी होत.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात संस्कृत शिकवले.
इ.स. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले.
२५ मार्च रोजी याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
‘काळ’ने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत ‘केसरी’लाही मागे टाकले असे म्हटले जाते.
त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांमध्ये केली होती.
ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात असत.
‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला. विष्णुशास्त्री चिपळूकर शिवरामपंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांचा शिवरामपंतांवरील प्रभाव लेखनातून ठळकपणे जाणवतो.
इ.स. १९२० साली शि.म.परांजपे यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले.
इ.स. १९२२ मध्ये त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला.
वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच त्यांनी ग्रंथलेखनही केले.
‘विंध्याचल’, ‘संगीत कादंबरी’, ‘मराठ्यांच्या लढ्याच्या इतिहास’, ‘रामायणाविषयी काही विचार’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
इ.स. १९२९ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
शि.म.परांजपे हे कथालेखकही होते.
आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचार’ या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत.
रत्नाकर मासिकातून त्यांचे लेखन प्रकाशित होत असे.
वि. का. राजवाडे यांच्या भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचा सहभाग होता.