जन्म | २० मे १८५० पुणे (महाराष्ट्र) |
---|---|
मृत्यू | १७ मार्च १८८२ |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | निबंध |
चळवळ | भारतीय स्वातंत्र्यलढा |
प्रसिद्ध साहित्यकृती | निबंधमाला |
विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते.
त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले.
१८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला.
विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता.
बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत.
शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स.१८७५ मध्ये बंद पाडले.
पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक
पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला.
त्यांनी सन १८७२ ते १८७७ या सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ |१८७९]] या सालांदरम्यान त्यांनी रत्नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
१८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले.
१८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली.
निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले.
त्यांनी इ.स. १८७८ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले.
त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला.
इ.स. १८७५ मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले.
उमलत्या पिढीला ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्याच्या उद्दिष्टातून,१८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
१८८१ सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले.
चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली.
त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते.
त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.