२७ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२७ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |27 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२७ एप्रिल चालू घडामोडी

जागतिक बुद्धिबळ लढतीला पुन्हा रंगतदार वळण; इयान नेपोम्नियाशीच्या चुकीमुळे १२व्या डावात डिंग लिरेनचा विजय

  • रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीने पटावर भक्कम स्थितीत असताना केलेल्या चुकीमुळे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या १२व्या डावात चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनला विजय मिळवण्यात यश आले. या निकालामुळे जागतिक लढतीस पुन्हा रंगतदार वळण मिळाले असून दोन डाव शिल्लक असताना आता डिंग आणि नेपोम्नियाशी यांच्यात ६-६ अशी बरोबरी झाली आहे.
  • लढतीत पिछाडीवर असणाऱ्या डिंगवर १२व्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना विजय मिळण्यासाठी दडपण होते. डिंगने डावाची सावध सुरुवात केली, पण नेपोम्नियाशीने १९व्या चालीत वर्चस्व मिळवले. त्याने उंटाची ‘सी२’ ही चाल खेळली. त्यानंतर नेपोम्नियाशीने आणखी काही चांगल्या चाली रचल्या. २५व्या चालीपर्यंत नेपोम्नियाशीने पटावरील आपली स्थिती भक्कम केली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंनी आक्रमक चाली रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी नेपोम्नियाशीने चुका केल्या आणि त्याच त्याला महागात पडल्या.
  • ३४व्या चालीत नेपोम्नियाशीने ‘एफ५’वर आपले प्यादे नेले आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. त्याने ‘ई६’वर प्यादे आणण्याची लिरेनला संधी दिली आणि लिरेनने हत्ती त्या ठिकाणी आणला. यानंतर नेपोम्नियाशीने आपली हार मान्य केली.नेपोम्नियाशीने हार मान्य केली आणि जागतिक अजिंक्यपद लढतीत पुन्हा बरोबरी झाली. नेपो अप्रतिम खेळ करत होता आणि विजय त्याच्या दृष्टिक्षेपात होता. मात्र, डिंगने हिंमत दाखवली आणि आक्रमक चाली रचून धोका पत्करला. तो पराभूत होणार असे वाटत असताना नशिबाची त्याला साथ लाभली.

देशभरात १५७ नवी सरकारी परिचारक महाविद्यालये;केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

  • देशभरात १५७ नवी सरकारी परिचारक (नर्सिग) महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. जिथे वैद्यकीय महाविद्यालये असतील तिथेच ही महाविद्यालये उभी केली जाणार असून प्रत्येक नव्या परिचारक महाविद्यालयासाठी केंद्र सरकार १० कोटींचे अर्थसाह्य करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत दिली
  • नव्या परिचारक महाविद्यालयांमधून दरवर्षी १५ हजार ७०० अतिरिक्त परिचारक देशाच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील. २०१४ नंतर ४ टप्प्यांमध्ये १५७ वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली होती. त्यांच्या पायाभूत सुविधांचा उपयोग परिचारक महाविद्यालयांसाठी होऊ शकेल. देशभरात १ लाख ६ हजार वैद्यकीय जागा उपलब्ध आहेत पण, बीएससी नर्सिगच्या पदवीसाठी केवळ १ लाख १८ हजार जागाच उपलब्ध आहेत. देशभर नवनवीन सरकारी रुग्णालये सुरू होत असल्यामुळे बीएससी नर्सिगची पदवी घेणाऱ्या परिचारकांची मागणी वाढू लागली आहे. त्या तुलनेत जागांची उपलब्धता कमी आहे, असे मंडाविया म्हणाले.

वैद्यकीय उपकरण निर्मितीमध्ये आत्मनिर्भर योजना

  • वैद्यकीय उपकरण निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. देशांतर्गत वैद्यकीय उपकरण निर्मितीची उलाढाल ९० हजार कोटी इतकी असून या क्षेत्रात विस्ताराच्या मोठय़ा संधी उपलब्ध होऊ शकतात. आत्ता ७५ टक्के वैद्यकीय उपकरणे आयात केली जातात. परदेशी बाजारपेठेवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सर्वंकष धोरण राबवले जाणार असल्याचे मंडाविया यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वी ४ वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्काना मंजुरी दिली आहे. उपकरण निर्मितीसाठी उद्योगांना मंजुरी देण्यासाठी ऑनलाइन एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. पुढील २५ वर्षांनी देश वैद्यकीय उपकरण निर्मितीचे मुख्य केंद्र बनेल व जागतिक बाजारपेठेत देशी बनावटीच्या वैद्यकीय उपकरणांचा वाटा १०-१२ टक्के होऊ शकेल. तसेच, देशांतर्गत बाजारपेठ ४ लाख कोटींची होईल, असे मंडाविया म्हणाले.

“अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई…”, भालचंद्र नेमाडेंचं मोठं विधान

  • ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” असं मोठं विधान केलं आहे. हे सांगतानाच त्यांनी आपल्याकडे नैतिकता म्हणजे धर्म असंही नमूद केलं. तसेच अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे, असंही नेमाडेंनी नमूद केलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
  • भालचंद्र नेमाडे म्हणाले, “आपल्याकडे धर्म म्हणजे तुमची नैतिकता होय. नैतिकतेला धर्म म्हटलं जात होतं. खानेसुमारीपासून ख्रिश्चन, मुस्लीम असे धर्म सुरू झाले. त्याआधी आपल्याकडे असे धर्म नव्हते. आपण वारकरी होतो, लिंगायत होतो, कुणाची बायको महानुभव असायची, कुणी वारकरी असायचं, नाथ संप्रदायी असायचे, कुणी बौद्ध असायचे. आपल्याकडे अनेक सरमिसळी होत गेल्या. असा धर्म आपल्याकडे कधी नव्हता.”

“सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू”

  • “आपल्याकडे हिंदू असणं म्हणजे सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू होते. अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे. कारण अकबरसह सगळे हिंदूच होते. ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती. हे आपण मान्य केलं पाहिजे की, आपण सगळे एकच आहोत,” असं मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं.

“द्वेष पसरवल्याने भारताची फाळणी”

  • भालचंद्र नेमाडे पुढे म्हणाले, “दुर्दैवाने मधल्या काळात हा वेगळा, तो वेगळा असं झालं. एकमेकात द्वेष पसरवण्यात आला. त्यामुळेच आपल्या देशाची फाळणी झाली. त्यातून नुकसान झालं. पाकिस्तानचे लोक युद्धावर आर्थिक खर्च करतात, आपणही खर्च करतो. दोघांचंही नुकसान होत आहे. हे या धर्म कल्पनेमुळे झालं.”

“महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण!”, सरकारची ‘ही’ योजना देशात ठरली अव्वल, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

  • भारतातील जलाशयांच्या गणनेचा अहवाल जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हा अहवाल जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून याबाबत महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली.
  • “महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक जलसंधारणाच्या योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत. महाराष्ट्राला पाण्याची समस्या यापुढे जाणवणार नाही याबद्दल महायुती सरकार कटिबद्ध असून त्यास अनुसरून विविध योजना देखील यशस्वीपणे सरकार राबवित आहे”, असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
  • या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१८-१९ या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.

Amazon Prime युजर्सच्या खिशाला लागणार कात्री! ‘या’ प्लॅन्सच्या किंमतीमध्ये झाली वाढ, जाणून घ्या काय असणार नवीन दर?

  • प्रत्येकजण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये OTT प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. शॉर्ट फिल्म, वेबसिरीज किंवा चित्रपट पाहण्यासाठी Amazon Prime , Netflix , Hotstar आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतो. ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन आपल्या प्राइम मेंबरशिपच्या किंमती सतत बदलत असते. काही महिन्यांपूर्वी, अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने प्राइम मेंबरशिपसाठी स्वस्त दर जाहीर केले होते. मात्र यामध्ये आता Amazon प्राईमचे मेंबर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.
  • आता Amazon या कंपनीने पुन्हा एकदा प्राईमच्या किंमतीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या प्लॅन्सच्या किंमतीमध्ये पहिल्यापेक्षा वाढ केली आहे. ते थोडे जास्त वाढवण्यात आले आहेत. जर का तुम्ही Amazon Prime मेंबरशिप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आधीचे प्लॅनच्या किंमती आणि आता वाढ झाल्यावर या प्लॅनच्या काय किंमती झाल्या आहेत ते जाणून घेऊयात.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपचे फायदे?

  • ज्या लोकांजवळ Amazon prime ची मेंबरशिप आहे. त्यांना प्राईम शिपिंगसाठी सपोर्ट मिळतो. जे इतर वापरकर्त्यांपेक्षा प्राइम असणाऱ्या वापरकर्त्यांना फास्ट डिलिव्हरी मिळते. लोकांना प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम डील्स, प्राइम रीडिंग, प्राइम गेमिंग आणि Amazon फॅमिलीमध्येही अ‍ॅक्सेस मिळतो.

Amazon प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत किती वाढली?

  • Amazon प्राईमच्या काही प्लॅन्समध्ये कंपनीने वाढ केली आहे. भारतातील कंपनीचा एका महिन्याचा प्लॅन हा २९९ रुपयांपासून सुरु होतो. तर २०२१ मध्ये लॉन्च झालेल्या या प्लॅनची किंमत १७९ रुपये इतकी होती. यामुळे हे कळून येते की कंपनीने आपल्या प्लॅनमध्ये १२० रुपयांची वाढ केली आहे. तीन महिन्याचा जो प्राईम ४५९ रुपयांचा प्लॅन होता तो आता ५९९ रुपये झाले आहे. म्हणजे कंपनीने या प्लॅनमध्ये १४० रुपयांची वाढ केली आहे.

आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा: लक्ष्यचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात

  • भारताच्या लक्ष्य सेनचे आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मात्र, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सहज विजय मिळवून महिला व पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अशीच कामगिरी महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने केली.
  • राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या ट्रिसा-गायत्री जोडीने पिछाडीवरून मुसंडी मारताना इंडोनेशियाच्या त्रिया मायासारी-रिब्का सुगिआर्तो जोडीचे आव्हान ७-२१, २१-१७, २१-१८ असे मोडून काढले.माजी जगज्जेती सिंधूने ४६ मिनिटांत वेन ची सु हिचा २१-१५, २२-२० असा पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांतने अदनान इब्राहिमला केवळ २५ मिनिटांत २१-१३, २१-८ असे नमवले.
  • अपयशातून बाहेर पडण्यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रमापासून दूर राहून सरावावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लक्ष्य सेनचे पुनरागमन अपयशी ठरले. लोह कीन येऊने लक्ष्यचे आव्हान २१-७, २३-२१ असे परतवले. महिला एकेरीत मालविका बनसोडला जपानच्या गतउपविजेत्या अकाने यामागुचीकडून २३-२५, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या कोमांग आयू काहयाकडून आकर्षी कश्यप २१-६, २१-१२ अशी पराभूत झाली.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२७ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.