भगत सिंह (Bhagat Singh)
भगत सिंह (Bhagat Singh)

भगत सिंह (Bhagat Singh)

टोपणनाव :- भागनवाला

जन्म:- २७ सप्टेंबर १९०७ ल्यालपूर, पंजाब, भारत

मृत्यू :- २३ मार्च १९३१ लाहौर, पंजाब, ब्रिटिश भारत

चळवळ:- भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना:- 

  • नौजवान भारत सभा 
  • कीर्ती किसान पार्टी 
  • हिंदुस्तान सोशालिस्ट
  • रिपब्लिकन असोसिएशन

पत्रकारिता/ लेखन :-

अकाली, अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम

धर्मः – नास्तिक

प्रभाव :- समाजवाद, कम्युनिस्ट

प्रभावित :- चंद्रशेखर आझाद

वडील: – सरदार किशनसिंग संधू

आई: – विद्यावती

भगतसिंग

भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब भारतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला.

त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते.

ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला.

त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते.

काही कुटुंब सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते. त्याचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते.

त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभाहर दयाला यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.

त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत.

त्यांच्या आजोबांना त्यीा शाळेतील. लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मजूर नव्हती.

बारा वर्षे वय असताना जालियनवाला बागहत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. 

१४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले.

गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला.

त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.

इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटाली’ नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंगाने मार्च १९२६ मध्ये नवजवान भारत सभा’ स्थापन केली.

ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले.

या संघटनेत चंद्रशेखर आजाद, रामप्रसाद बिस्मिल,शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. 

नंतर एक वर्षाने विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेला.

एका पत्रात त्याने लिहिले आहे की, ‘मो जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणता आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमिष असू शकत नाही’.

भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते.

सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन‘ हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे.

ऑस्कर वाईल्डचे ‘व्हेरा-दि निहिलिस्ट’,

क्रोपोटकिनचेमेमॉयर्स’,

मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते.

त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत

विक्टर ह्युगोची ‘ला मिझरेबल’,

हॉलकेनचे इटर्नल सिटी’,

अप्टन सिंक्लेअरची ‘क्राय फॉर जस्टिस’,

रॉस्पिनची व्हॉट नेव्हर हॅपन्ड’,

गॉर्कीचीमदर ह्या कादंबऱ्याही होत्या.

देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.

जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते.

त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता.

साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

भगतसिंग हे उत्तम वक्ते होते.

१९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली‘ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला.

पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर अर्जुन’, ‘प्रताप’, इत्यादी दैनिकांत काम केले होते.

पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला.

सोहनसिंग जोशी यांचे ‘कीर्ती‘,
कानपूरचे ‘प्रभा’,
दिल्लीचे ‘महारथी’ नि
अलाहाबादचे ‘चाँद’ या नियतकालिकात ते लेखन करत असत.

त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम’ हा बलवंतसिंग या नावाने केला.

लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘चाँद’ च्या फाशी विशेषांकात ‘निर्भय’, ‘बलवंत’, व ‘ब्रिजेश’ या नावाने अनेक लेख लिहिले.

महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधांत ‘नॅशनल कॉलेज’ तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता.

भगतसिंगांनी ‘राणा प्रताप’, ‘दुर्दशा’,’ सम्राट चंद्रगुप्त’ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.

सवातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य

९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले.

असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर
‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले.

हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर
भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली.

‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ चे ध्येय

या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली.

भगतसिंगांचे विचार

बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले.
यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले.

मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.

समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये,
समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.

समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता.

कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते.

अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो.

मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो.

त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता.

जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले.

सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.

शहीद भगतसिंग आणि गांधीजी

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली.

ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस
२३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली.
भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली.

पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले.

त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला.

मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले – “कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले.”

भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.

नास्तिकत्व

ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा दावा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे.
कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते.
नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.

संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत.

यातच ८ एप्रिल १९२९ मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.

या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे, हे भगतसिंगांच्या “मी नास्तिक का झालो” या निबंधावरून स्पष्ट होते.

शहीद भगतसिंगांचा “मी नास्तिक का झालो” हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.

या निबंधामुळे भगतसिंग नास्तिक आहेत की नाहीत हा वाद बंद झाला.

भगतसिंग यांचे संग्रहालय

अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले 

खटकर कलाॅं येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. 

तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे.

संग्रहालय सोमवारी बंद असते.

येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची  स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्गीतेची प्रत येथे आहे.

दफनभूमीवरील स्मारक

 भारत – पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात  गेला होता. भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला.

तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.