Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 12 January 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१२ जानेवारी चालू घडामोडी
नागपूर विद्यापीठाच्या पुढील परीक्षा होणार नाही
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अट्टाहासामुळे परीक्षेचे काम ‘एमकेसीएल’ला देण्यात आले. मात्र, आता प्रशासन तोंडघशी पडले असून, ‘एमकेसीएल’कडून विद्यार्थ्यांची माहिती न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षाच होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- ‘एमकेसीएल’ने वित्त विभागाकडे ३३ लाखांची देयके सादर केली आहेत. परंतु, संंबंधित कंपनीशी झालेला करारच अवैध असल्याने त्यांना पैसे कुठल्या आधारावर देणार, असा काहींचा आक्षेप आहे. त्यामुळे, कुलगुरूंच्या चुकीच्या निर्णयाचा फटका प्रशासनासह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागणार आहे.
- कुलगुरू डॉ. चौधरी यांनी ‘एमकेसीएल’सोबत विद्यापीठाचा करार रद्द झालेला असतानाही संबंधित कंपनीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्यांना परीक्षेचे काम देण्याचा निर्णय घेतला. ‘एमकेसीएल’ने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संकलित करून परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षांचा निकाल सहा महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटूनही जाहीर करता आला नाही. यासंदर्भात राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे अनेक तक्रारी झाल्या. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर विद्यापीठामध्ये संबंधित विषयावर बैठक घेऊन ‘एमकेसीएल’सोबतचा करार रद्द करण्याच्या सूचना दिल्या.
- विद्यापीठाने काही महिन्यांनी करार रद्द केला. मात्र, आता ‘एमकेसीएल’ परीक्षेचे काम केल्यामुळे विद्यापीठाकडे ८६ लाख रुपयांची मागणी करत आहे. ‘एमकेसीएल’ला पैसे न दिल्यास ते विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे असलेली संपूर्ण माहिती देणार नाही. माहिती न मिळाल्यास विद्यापीठाला पुढील परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षांना आडकाठी निर्माण होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा, केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी ७५ टक्के गुण अनिवार्यतेबाबत एनटीएकडून अंशतः बदल
- केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी-तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी यंदा लागू करण्यात आलेली बारावीला ७५ टक्के अनिवार्यतेच्या अटीमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार (एनटीए) सर्व मंडळांच्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेंटाइलमधील विद्यार्थी त्यांच्या जेईई मुख्यतील गुणांसह प्रवेशासाठी पात्र ठरू शकणार आहेत.
- एनटीएने करोना काळात केंद्रीय संस्थांतील प्रवेश पात्रतेमध्ये बदल करून बारावीला ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट स्थगित केली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी बारावीला ७५ टक्के गुणांची अट पुन्हा लागू करण्याचा निर्णय एनटीएने घेतला. या निर्णयावर विद्यार्थी-पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एनटीएसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे ही अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, न्यायालयात याचिकाही दाखल झाली. या पार्श्वभूमीवर एनटीएने घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
- एनआयटी, आयआयआयटी आणि केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जेईई मुख्यच्या गुणांसह बारावीला किमान ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे किंवा संबंधित परीक्षा मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण पहिल्या २० पर्सेंटाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीला ६५ टक्के गुण अनिवार्य आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
नदीतील सर्वाधिक लांब क्रूझचे उद्या उद्घाटन
- ‘एमव्ही गंगा विलास’ या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझचे, तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत.
- याच कार्यक्रमात पंतप्रधान १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या इतर अनेक अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, काहींचा शिलान्यासही करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
- ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.
वर्षभरात ‘बीएसएनएल’चे ‘५-जी’ गावागावात! ;‘सी डॉट, ‘टीसीएस’द्वारे विकसित तंत्रज्ञानावर आधारित सेवा
- दिल्ली, मुंबई या महानगरांमध्ये जीओ, एअरटेल या खासगी भ्रमणध्वनी सेवा कंपन्यांनी ‘५ जी’ सेवा पुरविण्यास सुरूवात केली असताना सरकारी कंपनी ‘बीएसएनएल’देखील आता या स्पर्धेत उतरणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांत देशभरात ‘४-जी’ सेवा सुरू होणार असून वर्षभरात ‘५-जी’ सेवा गावागावात पोहोचण्याची शक्यता आहे.
- देशी बनावटीचे दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करून ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीद्वारे सेवा पुरवण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करणारी सरकारी संस्था, ‘सेंटर फॉर डेव्हेलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ (सी डॉट) आणि टाटा समूहाच्या ‘टीसीएस’ कंपनीने एकत्रितपणे हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत ५०० दिवसांमध्ये देशभर २५ हजार मोबाइल टॉवर उभे केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने केली होती. टॉवर उभारण्याचे काम अजून पूर्ण झाले नसले तरी, एप्रिल २०२३ मध्ये ‘बीएसएनएल’ची ‘४-जी’ सेवा देशभर कार्यान्वित होऊ शकेल, असे दूरसंचार मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
- मोबाइल टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले नसल्याने देशी तंत्रज्ञानाची सेवा ग्राहकांना मिळण्यास विलंब होत आहे. ‘सी डॉट’ आणि ‘टीसीएस’च्या या संयुक्त उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ‘४ जी’ तंत्रज्ञानाच्या श्रेणीत सुधारणा करून ‘५ जी’ सेवाही पुरवली जाणार आहे. पुढील वर्षी एप्रिल २०२४ पर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ‘बीएसएनएल’ची ५ जी सेवाही ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल.
- सध्या जीओ, एअरटेल आणि व्होडाफोन या तीन खासगी कंपन्यांकडून सेवा घेण्याशिवाय ग्राहकांना पर्याय नाही. मात्र ‘बीएसएनएल’ची ‘४ जी’ सेवा ग्रामीण भागांतही पोहोचू शकेल व तिथे उच्चगतीची ब्रॉडबॅण्डसेवाही मिळू शकेल. ‘बीएसएनएल’मुळे ग्राहकांना नवा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. शिवाय, खासगी कंपन्यांवरील सेवा पुरवठय़ाचा ताणही कमी होण्यास मदत होईल, असे दूरसंचार मंत्रालयातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.
‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोब ; देशभरातून शुभेच्छांचा वर्षांव; सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान मात्र हुकला
- एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली. सर्वोत्तम बिगर-इंग्रजी चित्रपट पुरस्काराने मात्र आरआरआला हुलकावणी दिली.
- मंगळवारी रात्री हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने आयोजित केलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार पार पडला. यामध्ये आरआरआरला दोन नामांकने मिळाली होती. ज्येष्ठ संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले, कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला पुरस्कार मिळाल्याची घोषणा जेना ओर्टेगा हिने व्यासपीठावरून केली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.
- किरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना राजामौली यांचे आभार मानले. सर्वोत्तम बिगर इंग्रजी प्रकारात अर्जेटिनामध्ये बनलेल्या ‘अर्जेटिना १९८५’ या चित्रपटाने आरआरआरला मात दिली. असे असले तरी एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- शुभेच्छांचा वर्षांव – ‘आरआरआरने पटकाविलेल्या पुरस्काराचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या चमूचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या या यशावर बॉलिवूडमधील अनेकांनीही शुभेच्छांचा वर्षांव केला. अभिनेते अमिताभ बच्चन, शहारूख खान, चिरंजीवी, प्रभास यांनी राजामौली आणि चित्रपटाच्या चमूचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले.
विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या महासंग्रामाला आजपासून प्रारंभ:
- गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील 48 वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे.
- भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे.
- स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतापुढे सलामीला तुल्यबळ स्पेनचे आव्हान असेल.
- ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ सुवर्णपदके पटकावणारा भारतीय संघ गेल्या जवळपास पाच दशकांपासून विश्वचषकात मात्र पदकापासून वंचित आहे.
- 1978 ते 2018 या कालावधीत भारताला विश्वचषकात साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नाही.
ईडन गार्डनवर दिसली कुलदीपने मोडले अनेक विक्रम:
- पहिल्या एकदिवसीय सामन्यात युजवेन्द्र चहलला दुखापत झाल्याने श्रीलंकेविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने त्याच्या ऐवजी कुलदीप यादवला अंतिम अकरा मध्ये स्थान दिले.
- कुलदीपने मागील सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्याआधीच त्याला माघारी पाठवले.
- ही कामगिरी करताना त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.
- श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने एकापाठोपाठ तीन विकेट घेत बळींचे द्विशतक पूर्ण केले.
- कुलदीपने आजच्या या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 200 बळी पूर्ण केले.
- हा पराक्रम करण्यासाठी कुलदीपला 107 सामने आणि 110 डाव खेळावे लागले आणि या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो भारताचा 23वा गोलंदाज ठरला.
- कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 72 सामने खेळत सर्वाधिक 122 विकेट्स घेतल्या आहेत.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ११ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १० जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ९ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ८ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- ७ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |